बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जळगाव जामोदच्या ‘सरकटी लाश’ प्रकरणाने आता बुलढाणा पोलीस दलात अक्षरशः भूकंप घडवला आहे. शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. मात्र सवाल इथेच थांबत नाही; तपासाला दिशा देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार? असा थेट प्रश्न आता जनतेतून उपस्थित होत आहे.
‘हॅलो बुलढाणा’ने काही वेळापूर्वीच DGP मैदानात; चूक नेमकी कुणाची? असा सवाल उपस्थित केला होता. मात्र DGP सदानंद दाते यांच्या दौऱ्यापूर्वीच दोन निरीक्षकांवर निलंबनाचा बडगा उगारला गेल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते स्वतः या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी अमरावती सह जळगाव जामोदात येणार असल्याची सूत्रांची माहिती असून, या भेटीनंतर प्रकरणात आणखी मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणात सुरुवातीपासूनच अनेक धक्कादायक प्रश्न उभे राहतात. कोणताही सबळ पुरावा नसताना आदिवासी समाजातील पिता-पुत्रांना अटक का करण्यात आली? DNA अहवाल येण्याआधीच मृतदेह शिवानीचाच असल्याचा अंदाज पोलिसांनी कसा बांधला? सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत नेमका कोणता तपास झाला? अनोळखी मृतदेहाची ओळख न पटताच पोलिसांनी निष्कर्ष कसा काढला? आणि सर्वात गंभीर म्हणजे, अनोळखी मृतदेहाचे खरे प्रकरण दडपण्यासाठी तर हे बनावट हत्याकांड उभे करण्यात आले नव्हते ना?
तब्बल अधिकारी आणि अंमलदारांची टीम तपासात असतानाही मृत महिलेची ओळख अद्याप पटत नसेल, तर ही केवळ चूक आहे की तपासातील गंभीर गडबड? दोन PI निलंबित झाले; पण मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठांची जबाबदारी कुठे? आता DGP दाते यांच्या आढाव्यानंतर बुलढाणा पोलीस दलातील आणखी कोणावर कारवाईचा हातोडा कोसळतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










