चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) शहरात वाढत्या मोबाईल चोरी व हरविल्याच्या घटनांवर अखेर चिखली पोलिसांनी जबरदस्त प्रहार केला आहे. तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीचे १९ मोबाईल शोधून काढत पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला आहे. ठाणेदार भूषण गावंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा यांचा अचूक वापर करत ही मोठी कामगिरी साध्य केली.
रिअलमी, ओप्पो, रेडमी, सॅमसंग, व्हिवो, वन प्लससह विविध कंपन्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून हे सर्व मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. हरवलेला मोबाईल परत मिळत नाही ही नागरिकांची धारणा चिखली पोलिसांनी पूर्णपणे खोटी ठरवली आहे.
या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास प्रचंड वाढला असून पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित झाली आहे. पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.











