चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील केळवद परिसरात भरधाव वेगाने धावणाऱ्या मालवाहू पिकअपने भीषण अपघात घडवत एका होमगार्डचा जीव घेतला. आत्माराम उत्तमराव वखरे (वय 57, रा. सवाना ता. चिखली) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी होमगार्डचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वखरे हे पोलीस स्टेशन चिखली येथील शासकीय टपाल घेऊन दुचाकीवरून बुलढाण्याकडे जात होते. दुपारी सुमारे 12:40 वाजताच्या दरम्यान केळवद येथे ते रस्त्याच्या कडेला थांबले असताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या अनोळखी पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वखरे यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. भरधाव वाहनांवर नियंत्रण नसल्याने निरपराधांचे बळी जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
घटनेचा पुढील तपास पीएसआय शरद भागवतकर, पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास पंढरे व विनोद ब्राह्मणे करीत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आरोपी वाहनचालक फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.











