बुलढाणा (हॅलो बुलडाणा) “क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण दुर्लक्ष केल्यास जीवघेणा ठरतो!” असा ठाम इशारा देत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी क्षयरोगमुक्त जिल्ह्यासाठी सर्वांनी आक्रमकपणे पुढाकार घेण्याचे आवाहन केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांना थेट जबाबदारीची जाणीव करून दिली.
जिल्ह्यात 2025 मध्ये तब्बल 2,498 रुग्ण आढळले, तर 2026 च्या पहिल्या तीन महिन्यांतच 497 रुग्णांची नोंद – ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. मात्र, डिजिटल एक्स-रे, CBNAAT व TrueNAAT सारख्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे ग्रामीण भागातही जलद व अचूक निदान शक्य झाले आहे.
‘क्षयरोग मुक्त पंचायत’ अभियानात 326 ग्रामपंचायतींनी बाजी मारली, तर 22 ग्रामपंचायतींना ‘सुवर्ण’ सन्मान मिळाला. ‘निक्षय मित्र’ उपक्रमातून 7,166 फूड बास्केट वाटप करून रुग्णांना दिलासा देण्यात आला.










