मेहकर (हॅलो बुलढाणा) आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून त्याची झळ आता थेट ग्रामीण भागाला बसत आहे. मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे ही गंभीर परिस्थिती उभी ठाकली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित या आश्रमात सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यापैकी तीन हजार विद्यार्थी गुरुकुलमध्ये निवासी आहेत.
व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने या हजारो विद्यार्थ्यांच्या जेवणाची जबाबदारी आता चुलींवर आली आहे. दिवसातून दोन वेळा जेवण बनवताना महिलांना प्रचंड उकाडा आणि धुराचा सामना करावा लागत आहे. वाढत्या तापमानात चुलीसमोर तासन्तास उभं राहणं म्हणजे आरोग्याशी थेट खेळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.
धुरामुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे त्रास आणि थकवा अशा समस्या महिलांना भेडसावत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा स्वयंपाक चुलीवर करणं म्हणजे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा गंभीर नमुना असल्याची टीका होत आहे.
तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरत असून, प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.










