बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यासाठी ही केवळ बातमी नाही, तर वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या दुर्गम व आदिवासी भागांच्या हक्कांची अधिकृत दखल आहे! शासनाने जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करत याबाबतची अधिसूचना थेट शासन राजपत्रात प्रसिद्ध केली असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या आता ८७५ वर पोहोचली आहे.
संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गत वसंतनगर (ता. चिखली) आणि राजगड (ता. मेहकर) या दोन नव्या ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत. तर सर्वसाधारण निकषांअंतर्गत धायफळ (ता. लोणार), वायाळ (निमखेडी) व चालठाणा खुर्द (ता. जळगाव जामोद) या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे.
हा निर्णय म्हणजे केवळ कागदावरील बदल नाही, तर पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शासकीय योजनांचा थेट लाभ गावपातळीवर मिळण्याचा मार्ग मोकळा करणारा आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या गावांचा विकास आता थांबवता येणार नाही, हेच या निर्णयातून स्पष्ट होते. नवीन ग्रामपंचायती सार्वत्रिक निवडणुकांनंतर नियमानुसार गठित होतील.












