रायपूर (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन/रायझिंग डे सप्ताहानिमित्त रायपूर पोलीस स्टेशनतर्फे श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित जनजागृती कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, कायदा आणि कर्तव्यभावनेची ठिणगी पेटवली. ठाणेदार निलेश सोळंके यांनी थेट, ठाम आणि प्रभावी शब्दांत महाराष्ट्र पोलीस दलाची भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडत समाजरक्षणाची जबाबदारी अधोरेखित केली.
पोलीस दलाचा इतिहास, रचना व कार्यपद्धती सांगतानाच कायदा-सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध व तपास, नागरिकांचे संरक्षण, वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, महिला व बालक सुरक्षा, तसेच सायबर गुन्ह्यांवरील कठोर उपाययोजना यावर त्यांनी ठोस मार्गदर्शन केले. कायद्याचे पालन हा पर्याय नाही, ती जबाबदारी आहे, असा स्पष्ट संदेश देत शिस्त, प्रामाणिकपणा, निष्ठा, सेवाभाव आणि धैर्य ही पोलीस दलाची मूलभूत मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवली.
आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी कसा संपर्क साधावा, सामाजिक जबाबदारी कशी जपावी याचेही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक (पोस्टर) रायपूर, पोलीस अंमलदार कैलास खराडे, दशरथ शितोळे, संजय चौरे, राहुल जाधव, अनंत कळमकर, लक्ष्मण शिंदे, अख्तर शेख, अझरुद्दीन काझी तसेच शिक्षक गजानन जाधव व सोमनाथ नप्ते उपस्थित होते.












