देऊळघाट (हॅलो बुलडाणा/इमरान खान) बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे देऊळघाट येथे गेल्या तीन–चार महिन्यांपासून चोरीच्या घटनांनी अक्षरशः कहर केला आहे. रोख रक्कम, सोने-चांदी, शेळ्या, जनावरे, शेतमाल तसेच घरासमोर ठेवलेल्या मौल्यवान वस्तू चोरट्यांनी बेधडक लंपास केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल २० ते २५ चोरीच्या घटना घडूनही एकाही चोरीचा शोध लागलेला नाही!
या प्रकारामुळे गावकरी प्रचंड त्रस्त असून रात्री झोप उडाली आहे. संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वात गंभीर आरोप म्हणजे या चोरीच्या साखळीमागे बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे व पी.आय. शरद माळी यांच्या ‘आशीर्वादाने’च हे प्रकार सुरू असल्याचा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिकच बळावला आहे.
संतप्त ग्रामस्थांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत, येत्या १५ दिवसांत आरोपींचा शोध न लागल्यास ठाणेदार व संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ हटवून कर्तव्यदक्ष अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. अन्यथा बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने अमरण उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.










