देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) ऐतिहासिक परंपरेनुसार श्री बालाजी महाराजांच्या यात्रोत्सवात गर्दभ राजाच्या विक्रीला सुरुवात झाली आहे.५० पेक्षा अधिक व्यापारी त्यांची सुमारे २०० गाढवे घेऊन आलेत तर ५० टक्के गाढवांची विक्री झालेली आहे.
गत ३३३ वर्षांची परंपरा असलेला श्री बालाजी महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या यात्रेत उंच रहाट पाळण्यांची व्यवस्था असते. महिलांसाठी संसारोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने तसेच लहान मुलांची खेळणी अशा विविध वस्तूंची विक्री होते. या यात्रोत्सवातील एक आकर्षण म्हणजे गर्दभ अर्थात गाढवांचा व्यापार होय. दि.३ आक्टोबर पासून या यात्रेमधील गर्दभ व्यापार सुरू झाला आहे. ५० पेक्षा अधिक व्यापारी त्यांची सुमारे २०० गाढवे घेऊन तहसील कार्यालयासमोरील नियोजित जागेत भरलेल्या बाजारात सहभागी झाले आहेत.
आपल्या धार्मिक तसेच ऐतिहासिक परंपरा कायम राखण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी इतरांप्रमाणेच या गाढवांच्या व्यापाऱ्याचा देखील प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार केला व त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.
जागावाटप समितीचे सदस्य जगदीश कापसे यांनी श्री बालाजी संस्थान तसेच जागावाटप समितीमार्फत या व्यापाऱ्यांच्या गाढवांची तहान भागविण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली तसेच नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या बाजाराच्या ठिकाणी दिव्यांची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
यावर्षी या बाजारात व्यापाऱ्यांनी प्रामुख्याने ‘कैकाडी गाढव’ या जातीची गाढवे विकण्यासाठी आणलेली आहेत. गाढवांची ५०% विक्रीसुद्धा झालेली आहे. एक दोन दिवसात संपूर्ण गाढवांची विक्री होऊन हा बाजार संपुष्टात येईल. जनावरांचे डॉक्टर अमोल मानतकर यांनी या गाढवांची आरोग्य तपासणी करून, त्यांच्या जखमांवर औषधोपचार करून, गाढवांसाठी व्यापाऱ्यांना आवश्यक ती औषधी वाटप केली आहे. व्यापाऱ्यांना मिळालेल्या सुविधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.