बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आहारामध्ये पोषण मूल्यांची रुजवात होणे अत्यावश्यक असून सशक्त भारत घडविण्यासाठी सकस आहार महत्त्वाचा असल्याची मार्गदर्शक सूचना प्रा.डॉ.सुरेश गवई यांनी केली. जिजामाता महाविद्यालयात 28 सप्टेंबरला आयोजित पोषण आहार प्रदर्शनीत ते उद्घाटक म्हणून बोलत होते. राष्ट्रीय पोषण आहार प्रदर्शनीच्या माध्यमातून ‘विस्मृतीत जात असणाऱ्या पौष्टिक भारतीय पाककृतींच्या प्रदर्शनीने काल जिजामाता महाविद्यालयात अनेकांचे लक्ष वेधले! प्राचार्य डॉ. सुरेश गवई यांच्या हस्ते उद्घाटित झालेल्या या आहार पोषण प्रदर्शनीला उस्फूर्त प्रतिसाद लाभला असून,यावेळी ‘कुपोषणमुक्ती’चा जागर करण्यात आला.
शरीराला योग्य ते पोषण मिळावं आणि तंदुरुस्त राहावं अशी आपली सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी आपण आपल्यापरीने प्रयत्न देखील करत असतो.पण आपली जीवनशैलीच अशी आहे की त्यात अनेकदा आपलं आपल्या आरोग्याकडे आणि आहाराकडे सर्वाधिक दुर्लक्ष होतं. चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पदार्थांच्या सेवनाने बिघडलेली जीवनशैली पुन्हा रुळावर आणणं हे आपल्यासाठी एक मोठं आव्हानच आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या शरीराला असणाऱ्या पोषणाच्या गरजेविषयी लोकांना माहिती देण्यासाठी विविध जागरूकता उपक्रम आयोजित केले जात असतात.येथील जिजामाता महाविद्यालयात देखील शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाने 28 सप्टेंबरला आहार पोषण प्रदर्शनीचे आयोजन केले होते.याप्रसंगी विज्ञान शाखा प्रमुख व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.संतोष कुंभारे,कला शाखाप्रमुख डॉ. जे.जे.जाधव, आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुबोध चिंचोले, प्रा.संजय सावळे, डॉ.देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी
आहारामध्ये पोषण मूल्यांची रुजवात होणे अत्यावश्यक असून सशक्त भारत घडविण्यासाठी सकस आहार महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ. सुरेश गवई यांनी केले. कला विज्ञान व वाणिज्य या तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीत सहभाग घेऊन योग्य पोषण आहाराचा जागर केला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.गजानन लोहटे,महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राजश्री येवले, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. प्रदीप वाघ सह कार्यक्रम अधिकारी प्रा.रामेश्वर बनकर राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी पुढाकार घेतला.