बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरासह जिल्ह्यात आरओचे प्लांट घरोघरी थाटण्यात आली असून, पाण्याचा गोरखधंदा जोमात सुरू आहे.साध्या पाण्याला थंडगार बनवून कॅनद्वारे आरओचे पाणी म्हणून लोकांना देतात.पाणी एवढे थंडगार असते की त्यामध्ये पाण्याची चव लक्षातच येत नाही. त्यामुळे थंडगार पाणी म्हणजे आरोग्यदायक पाणी असा समज अलीकडे रूढ होत आहे.
थंड पाणी म्हणजे आरओचे पाणी अशी लोकांची धारणा झाल्याने थंड पाण्याचा हा व्यवसाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. शहरासह बुलढाणा जिल्ह्यात शेकडो आरओचे प्लांट आहेत. या प्लांटमधील पाणी लोकांच्या घरी, दुकानात, समारंभात वाटप केले जाते. मात्र, हे पाणी खरोखरच आरओचे आहे का? शासनाने आरओच्या पाण्यासाठी जे निकष ठेवले आहे ते निकष हे प्लांट पूर्ण करतात का? हे तपासणारी कोणतीही यंत्रणा सध्या कार्यरत नाही. त्यामुळे साधे पाणी थंडगार करुन नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. सीलबंद पाण्याचे चलन वाढले आहे. दरम्यान अन्न व औषध विभागामार्फत या प्लांटची तपासणी केव्हा करणार? शासनाच्या निकषानुसार सुरू नसणाऱ्या आरओ प्लांटचा परवाने विभागामार्फत रद्द करण्यात का येत नाही? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.














