बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासाठी सुरू असलेले रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्य सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी बुलढाण्यात येऊन तुपकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर सरकारने मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी चार दिवसांची वेळ मागितली असून, तुपकरांसह शेतकरी नेते सरकारसोबत पुढील चार ते पाच दिवसांत चर्चा करण्यास तयार झाले आहेत.
मात्र आंदोलन स्थगित झाले असले तरी संघर्ष संपलेला नाही. “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस तोडगा निघाला नाही, तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल,” असा थेट इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आता सरकार या चार दिवसांत काय निर्णय घेते, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.











