मेहकर (हॅलो बुलडाणा) “शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालणार नाही! शेतरस्ते तत्काळ मोकळे करा अन्यथा कारवाईला तयार राहा,” अशा स्पष्ट शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी महसूल प्रशासनाला खडसावले.दिनांक 6 जून रोजी मेहकर येथील हॉटेल के व्ही प्राईडमध्ये आयोजित शेत रस्ते आणि पांदन रस्त्यांच्या आढावा बैठकीत खरात यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवर संताप व्यक्त केला. हार्वेस्टर, ट्रॅक्टरसारखी यंत्रे अडथळ्यामुळे शेतापर्यंत पोहोचू शकत नसल्याने पेरणी, नांगरणीस अडथळे येत असल्याचा मुद्दा त्यांनी लावून धरला.
तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि भूमिअभिलेख अधिकाऱ्यांना आठ दिवसात तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश देत, “शेतकऱ्यांच्या वाटेला कोणी जाऊ नये,” असा सज्जड दम त्यांनी भरला.या बैठकीस तहसीलदार नीलेश मडके, गटविकास अधिकारी डी. बी. खरात, डॉ. उमेश देशमुख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर, शिवसेनेचे आशिष रहाटे, राष्ट्रवादीचे भास्करराव काळे, काँग्रेसचे देवानंद पवार यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.