spot_img
spot_img

खाटू श्यामजींच्या दर्शनार्थ बुलढाण्यात रेल्वे यात्रा! महिला-ज्येष्ठांनीनोंदविला ६१ टक्के सहभाग! भाविकांनी घ्यावी अविस्मरणीय अनुभूती! राधेश्याम चांडक यांचे आवाहन..!

बुलडाणा (हॅलो बुलढाणा) खाटू श्यामजींच्या दर्शनाची आणि श्रीमद् भागवत कथेची अनुभूती घेता यावी, यासाठी सद्भावना सेवा समितीच्या वतीने ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान आयोजित खाटू श्याम रेल्वे यात्रेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे यात्रेतील तब्बल ६१ टक्के सहभागी महिला व ज्येष्ठ नागरिक आहेत.भाविकांनी यात्रेची अविस्मरणीय अनुभूती घ्यावी, असे आवाहन सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे.

ज्येष्ठांना एकट्याने प्रवास करता येत नसल्याने धार्मिक यात्रा करण्याची इच्छा अपूर्ण राहणाऱ्या भक्तांसाठी समितीने सुरक्षित रेल्वे प्रवासासह निवास, भोजन आणि धार्मिक कार्यक्रमांची व्यवस्था केली आहे. भक्तांनी समितीवर दाखविलेला विश्वास ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक भक्ताला आनंददायी व संस्मरणीय यात्रा अनुभवता यावी, यासाठी समिती प्रयत्नशील आहे, असा विश्वास सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केला आहे. भक्तांना सकस आहार मिळावा आणि संपूर्ण प्रवासात चोख व्यवस्था राहावी, यावर समिती विशेष लक्ष देत आहे.चंपालाल शर्मा, राजेश देशलहरा, प्रा. प्रकाशचंद्र पाठक, तिलोकचंद चांडक, सुरेशचंद्र गट्टाणी, सिद्धार्थ शर्मा, उमेश मुंदडा, विजय व्यवहारे, सुभाष दर्डा, मधुकर गायकी, पुरणमल शर्मा, बबन परांजपे, लाला माधवाणी, मनमोहन शर्मा, रामनिवास यादव यांच्यासह अनेक कार्यकर्ते यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत. समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक हे यात्रेच्या व्यवस्थेवर जातीने लक्ष ठेवून असून, कथा व यात्रा यशस्वी होण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती समितीचे सचिव प्रा. प्रकाशचंद्र पाठक यांनी दिली.

▪️खाटूच्या भूमीत पाच दिवस भागवत कथा!

खाटू श्यामजींच्या पावन भूमीत पाच दिवस श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेसाठी उभारण्यात आलेला मंडप खाटू श्यामजींच्या मंदिराच्या धर्तीवर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आला आहे. यात्रेतील भक्तांच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर परिसरातील तीन ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी तीज व चतुर्थीनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कथामंडपात महिलांच्या सहभागातून तीज पूजन व चतुर्थी पूजन होणार असून, खाटू श्यामजी मंदिरातील विशेष पंडित हे विधी पार पाडणार आहेत. यावेळी भक्तांसाठी फराळाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

▪️मंगल कलश यात्रा व सुंदरकांड!

३१ ऑगस्ट रोजी दुपारी बाल संत श्री. दीपशरणजी महाराज यांच्या उपस्थितीत मंगल कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य यजमान सौ. सरला सुरेशचंद्र गट्टाणी आहेत. तसेच रायथल येथील प्रसिद्ध गायक व वाद्यवृंदाच्या सहभागातून सुंदरकांडाचे आयोजन करण्यात आले आहे.४ सप्टेंबर रोजी समितीच्या वतीने सालासर बालाजीचे दर्शन घडविण्यात येणार असून, त्यासाठी मिनी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या प्रारंभी ३० ऑगस्ट रोजीचे भोजन भक्तांनी स्वतःसोबत आणायचे असून, त्यानंतरची भोजन व्यवस्था समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.

▪️३ हजार किमीचा प्रवास; पाच रुपयांपेक्षाही कमी दर!

सुमारे ३ हजार किलोमीटरची ही रेल्वे यात्रा प्रति किलोमीटर पाच रुपयांपेक्षाही कमी खर्चात आयोजित करण्यात आली आहे. यात्रेची मधुर आठवण कायम राहावी, यासाठी समितीच्या वतीने प्रत्येक भक्ताला अल्पशी भेटही देण्यात येणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!