चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) मिरची विकून रात्री गावाकडे परतणाऱ्या शेतकऱ्यांचा मालवाहू वाहनातील प्रवास हातणी गावाजवळ अक्षरशः जीवघेणा ठरला. पुढे चालणाऱ्या दुचाकींना केवळ हॉर्न वाजवल्याच्या क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी गाडी अडवून शेतकरी व चालकाला काठ्या, लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी किन्होळा येथील राजेंद्र पाटीलबा बाहेकर यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, राजेंद्र बाहेकर आणि गजानन लक्ष्मण बाहेकर हे शेतातील मिरची पोत्यांमध्ये भरून टाटा सुप्रो मालवाहू वाहनातून जाफ्राबादच्या बाजारात विक्रीसाठी गेले होते. वाहन शेख मिसार शेख मैहमुद चालवत होते. मिरचीचा लिलाव झाल्यानंतर तिघे किन्होळ्याकडे परतत असताना हातणी गावाच्या मागे त्यांच्या वाहनासमोर एक स्कुटी आणि एक मोटारसायकल चालत होती.
पुढे जाण्यासाठी चालकाने हॉर्न वाजवताच दुचाकींवरील तरुण संतप्त झाल्याचा आरोप आहे. हातणीसमोर त्यांनी हात दाखवून मालवाहू गाडी थांबवली आणि “हॉर्न जोरात का वाजविला?” असे म्हणत वाद सुरू केला. राजेंद्र बाहेकर समजावून सांगत असतानाच त्यांच्या उजव्या हातावर व डोक्यावर काठीने प्रहार करण्यात आला. ते खाली कोसळल्यानंतर मदतीसाठी धावलेल्या गजानन बाहेकर यांच्या डोके, चेहरा, छाती आणि दोन्ही पायांवर काठ्यांनी तुफान मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. चालकालाही शिवीगाळ करत पाठ व कमरेवर लाथा-बुक्क्यांनी मारण्यात आले.
भगवान बाहेकर घटनास्थळी पोहोचताच हल्लेखोर हातणीच्या दिशेने पसार झाले. तक्रारीत सहा संशयितांची नावे नमूद करण्यात आली असून, जखमींनी बुलढाणा येथे उपचार घेतल्यानंतर चिखली पोलिसांकडे कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे










Total Users : 3252910