जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) तालुक्यात ३० जुलै २०२६ च्या रात्री मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. शहरातील तलावपुरा आणि वायलीवेस परिसरात पावसाचे पाणी घरांपर्यंत पोहोचल्याने गाढ झोपेत असलेल्या नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला. मात्र संकटाची चाहूल लागताच आमदार डॉ. संजय कुटे अर्थात संजूभाऊ यांनी प्रशासनासह थेट पूरग्रस्त भागात धाव घेत बचावकार्याची सूत्रे हाती घेतली.
तहसीलदार पवन पाटील, मलकापूर विभागाचे एसडीपीओ सोहन माचरे, जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल, शेडगे मॅडम, पोलीस कर्मचारी मोहाळे, धीरबस्सी, वेरूळकर, झाल्टे, रिंढे, राजपूत, बोंद्रे, नंदाने, सोळंके, पाटोळे, चाटे, खराटे आणि सोनोनो यांच्यासह स्थानिक नागरिकांनी रात्रीच्या अंधारात घराघरांत जाऊन नागरिकांना जागे केले.
पाण्याचा वेग वाढत असतानाही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि गरजू कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवले. लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या अचूक समन्वयामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
संकटाच्या काळात केवळ आदेश न देता ‘संजूभाऊ’ स्वतः मैदानात उतरल्याने नागरिकांना मोठा आधार मिळाला. “आपत्तीच्या काळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन आपल्या दारी” ही उक्ती जळगाव जामोदमध्ये प्रत्यक्षात उतरल्याचे पाहायला मिळाले. या धाडसी कामगिरीचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.










Total Users : 2729625