बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. जिल्हाधिकारी आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. पावसामुळे बाधित झालेल्या सर्व नागरिकांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ९२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९१ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून, अनेक भागांमध्ये अद्यापही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
सततच्या पावसामुळे उभी पिके, घरे तसेच विविध पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे सुरू केले आहेत. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवून असून पूरपरिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. संबंधित विभागांना बाधित शेती, घरे आणि इतर मालमत्तेच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी नदी, नाले आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.










Total Users : 2728637