मलकापूर (हॅलो बुलडाणा) रक्ताचे पाणी करून शेतकरी आसमानी व सुलतानी संकटांना तोंड देत जीवन कंठत आहेत.परंतु त्यांच्या आयुष्याला आसमानी व सुलतानी चटके बसत असल्याने शेतकऱ्यांची होरपळ दिसून येते.असाच भीषण चटका लावणारी घटना मलकापूर तालुक्यातील भाडगणी येथे घडली.या घटनेत शेतकऱ्याच्या घरासह गोठा आगीत भस्मसात झाला असून, त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
‘हॅलो बुलढाणा’ च्या हाती आलेल्या माहितीनुसार,मलकापूर तालुक्यातील भाडगनी येथील शेतकरी जगन्नाथ काशीराम शेगोकार यांच्या राहत्या शेतातील घराला व गोठ्याला अचानक आग लागली.या आगीत घरातील असलेले सर्व धान्य जाळून खाक झाले. त्यामध्ये 10 पोते गहू 5 पोते हरबऱ्याचा व काही प्रमाणात तुरीचा समावेश आहे.आग एवढी भीषण होती की, शेजारील गोठ्यात बांधलेल्या एका बैलाचा जळून मृत्यू झाला तर एक बैल गंभीर जखमी झाला आहे.जगन्नाथ शेगोकार हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह शेतात राहत होते. पत्नी व मोठा मुलगा बाहेरगावी गेले असल्याने त्यावेळी घरी कोणीच नव्हते. जगन्नाथ आपल्या लहान मुलासोबत दुसरीकडे असलेल्या शेतात काम करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला व जखमी जनावरांना उपचारासाठी दाखल केले आहे.