चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी नगरउपाध्यक्ष रफिक सेठ कुरेशी, सलीम भाई म्हण्यार आणि रशीद भाई यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.भाजपच्या आक्रमक राजकारणामुळे काँग्रेसमधील अनेक महत्वाच्या नेत्यांचा भाजपकडे कल वाढताना दिसत आहे. रफिक सेठ कुरेशी यांच्या पक्षप्रवेशामुळे चिखली शहरातील काँग्रेसची मोठी ताकद खिळखिळी झाल्याचे बोलले जात आहे. आता येत्या स्थानिक निवडणुकीत या प्रवेशाचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या रणनीतीने काँग्रेसला आणखी धक्के देण्याची शक्यता वर्तवली जात असून, आगामी काळात आणखी काही नेते भाजपमध्ये सहभागी होण्याचे संकेत मिळत आहेत. चिखलीतील राजकारण आता अधिकच रंगतदार होणार आहे.