संग्रामपूर (हॅलो बुलढाणा) तालुक्यातील पातुर्डा येथील शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या मृत्यूने संपूर्ण जिल्हा हादरला असून, हा अपघात नसून थेट सुपारी देऊन केलेला खून असल्याचे उघड झाल्याने संतापाची लाट उसळली होती. २ मार्च २०२६ रोजी शाळेत जात असताना झालेल्या अपघातात वृषाली यांचा मृत्यू झाला होता. मात्र तपासात धक्कादायक सत्य समोर आले स्वतः पतीनेच तीन लाखांची सुपारी देऊन पत्नीचा काटा काढल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणात पती प्रकाश गावंडे, त्याचा मित्र आणि वाहनचालक अशा तिघांना अटक करण्यात आली असली तरी, इतर संशयित अजूनही मोकाट असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही आरोपींना पोलिसांचे अभय आहे का? असा थेट सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून संपूर्ण तपास Central Bureau of Investigation (CBI) कडे सोपवण्याची जोरदार मागणी केली आहे.
इतकेच नव्हे तर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी नामांकित सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले असले तरी संपूर्ण कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्यामुळेच जिल्ह्यात पोलिसांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सत्य बाहेर आणण्यासाठी सीबीआय चौकशीच हवी अशी मागणी जोर धरत आहे.











