चिखली (हॅलो बुलढाणा) सध्या जिल्ह्यात रंगलेल्या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी ठाम आणि आक्रमक भूमिका घेत सर्व अफवांना अक्षरशः चिरडून टाकले आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या भेटीनंतर बोंद्रे हे पक्षांतर करणार, अशा चर्चांनी जोर धरला होता. मात्र, स्वतः बोंद्रे यांनी यावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
“गायकवाड यांची भेट ही केवळ औपचारिक होती. त्यामागे कोणतेही राजकीय समीकरण नाही,” असे स्पष्ट करत बोंद्रे म्हणाले, “माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि मी काँग्रेस कधीच सोडणार नाही म्हणजे नाही!” त्यांच्या या ठाम विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांत महाले-गायकवाड संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोंद्रे यांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारच्या राजकीय तडजोडीला नकार देत काँग्रेसप्रती निष्ठा पुन्हा अधोरेखित केली आहे.
बोंद्रे यांच्या स्पष्टीकरणामुळे ‘नवीन राजकीय समीकरण’ तयार होण्याच्या चर्चांना मोठा धक्का बसला असून, कार्यकर्त्यांमध्येही स्पष्ट संदेश गेला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे सध्याच्या राजकीय रणधुमाळीत काँग्रेसची बाजू अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.










