बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यात यंदा मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असताना नाफेडकडून देण्यात आलेले केवळ ६० हजार क्विंटलचे तुटपुंजे खरेदी उद्दिष्ट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरत आहे. ५२,८५५ हेक्टर क्षेत्रावर लागवड होऊन अंदाजे २० लाख क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित असताना खरेदी केंद्रे ‘उद्दिष्ट पूर्ण’ या कारणावरून बंद करण्यात आली आहेत. परिणामी हजारो शेतकरी अडचणीत सापडले असून खासगी व्यापाऱ्यांकडून भाव पाडण्याचा खेळ सुरू झाला आहे.
या गंभीर परिस्थितीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी जोरदार आवाज उठवला आहे. त्यांनी पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून खरेदी उद्दिष्ट तातडीने वाढवण्याची आणि बंद केंद्रे पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.
“एकीकडे हमीभावाच्या घोषणा आणि दुसरीकडे खरेदी बंद, हा शेतकऱ्यांवरील उघड अन्याय आहे,” असा घणाघात शेळके यांनी केला. नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा मका हमीभावाने खरेदी होईपर्यंत लढा कायम राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.











