चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) तालुक्यातील केळवद गावात प्रेमाच्या नावाखाली भावनांशी खेळ करून एका २० वर्षीय तरुणीचा बळी घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी तनमय विजय गवई याने तरुणीशी प्रेमसंबंध ठेवत “उन्हाळ्यात लग्न करीन” असे खोटे आश्वासन देऊन तिचा विश्वास संपादन केला. सतत फोनवर संपर्क, भेटीगाठी आणि लग्नाची स्वप्ने दाखवत आरोपीने तरुणीला मानसिकदृष्ट्या गुंतवून ठेवले होते.
मात्र २४ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १०.५३ च्या सुमारास आरोपीने अचानक फोन करून लग्नास स्पष्ट नकार दिला. या धक्क्याने पूर्णपणे खचलेल्या तरुणीने राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार आत्महत्या नसून, मानसिक छळातून घडवलेला गंभीर गुन्हा असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
मयत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात अप नं. 0072/2026 अन्वये कलम 108 भा.न्या.संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने दिलेल्या खोट्या आश्वासनांमुळेच तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होत आहे.प्रेमाच्या नावाखाली तरुणींच्या भावनांचा खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणार का, असा सवाल उपस्थित होत असून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे. पोस्टमार्टेमसाठी उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे दाखल केले व पुढील तपास चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमदार अनिल वाघ हे करीत आहे










