बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘निवडणूक प्रक्रियेत सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढतोय’ असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळकें यांनी केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या असून,या निवडणूक प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये, अशी मागणी करीत जिल्हाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीने आज निवेदन दिले आहे.
पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीची शासकीय प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे निवडणुकीच्या कार्यपद्धतीत किंवा नगर पालीकांची प्रभाग रचना असेल किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीत गट किंवा गणांचे क्षेत्र ठरवणे असेल यामध्ये सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढला आहे. तसेच नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील मुख्याधिकारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राजकीय प्रवाहात वावर दिसून येत आहे.त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकीय बाबींमध्ये सहभागी न होता निरपेक्षपणे आपले कर्तव्य बजवावे, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.