खामगाव (हॅलो बुलडाणा) भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते स्व. पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात अखेर जनतेचा आवाज पोहोचला! राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार १२ जून रोजी खामगाव दौऱ्यावर आले असता, स्व. देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादीचे नेते रंगराव देशमुख यांनी त्यांच्यासमोर थेट या प्रकरणाचे वास्तव मांडले. सीआयडीमार्फत चौकशी करून देशमुख कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.या निवेदनावेळी सुनीता पंकज देशमुख, कुटुंबीय व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण माहिती ऐकून दादा गहिवरले. त्यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या आणि “या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालीन,” असे ठाम आश्वासन देत देशमुख कुटुंबीयांना आणि जनतेला आश्वस्त केले.
दरम्यान, पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून, एका मोठ्या कटाचा भाग होता, अशी जोरदार चर्चा जिल्हाभर आहे. ही घटना केवळ जळगाव मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या जनतेच्या मनात थैमान घालत आहे. गावोगावी, चौकाचौकांत दबक्या आवाजात होणाऱ्या चर्चा आता जाहीर उद्रेकाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत!जातीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जळगाव जामोद मतदारसंघात शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा असलेली जनता असूनही, काही सत्तेच्या हव्यासापोटी तयार झालेल्या लोकांनी समाजात विष पेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हीच मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी निष्पाप लोकांचे बळी देत असल्याचा आरोप होतोय.