बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोणार नगरपालिका नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. दरम्यान दहा दिवसातून तरी एकदा स्वच्छ पाणीपुरवठा करावा,अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व नगरसेवक गजानन जाधव यांनी न.प. मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा नगरपालिकेत ‘ताला ठोको’ आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला आहे.
उल्कानगरी म्हणून ओळख असलेल्या लोणार शहराला अनियमित पाणीपुरवठा केला जातो. हे पिवळ्या रंगाचे पाणी असून पाणी दूषित असल्याचा अहवाल अहवाल मुख्य अणुशास्त्रज्ञ बुलढाणा यांनी 12 डिसेंबर 2023 व 8 फेब्रुवारी 2024 ला दिला आहे.असे असताना देखील नगरपरिषद दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत डॉ. बछिरे यांच्या तक्रारी नंतर विभागीय आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी श्री जोग यांच्या मार्फत दि. 7 जून रोजी पाण्याचे नमुने घेऊन मुख्य अनूजीवशास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांच्याकडे तपासणीस पाठविले होते. त्यानंतरही नळा द्वारे सोडलेले पाणी हे दूषित, दुर्गंधीयुक्त व पिवळ्या रंगाचे आहे. शुद्धीकरण यंत्र हे शोभेची वस्तू झाली असून जलशुद्धीकरणांमध्ये लागणारी रेती ही तीन वर्षापासून खरेदीच करण्यात आलेली नाही किंवा जलशुद्धीकरण प्रकल्पात रेती टाकण्यात आलेली नाही म्हणून 18 दिवस उलटून सुद्धा अद्याप सदरील पाण्याचे रिपोर्ट नगरपरिषदेस प्राप्त झालेले नाही किंवा मुख्य अणू जीवशास्त्रज्ञ यांनी मुख्य अधिकारी नगरपालिका लोणार यांचा बचाव करण्यासाठी सदरील पाण्याचा रिपोर्ट पाठविलेला नाही अथवा सदरील पाणीच प्रयोग शाळेत घेतलेही नसावे असा आरोप डॉ. बछिरे यांनी मुख्याधिकार्यावर केला आहे. दरम्यान येत्या ८ दिवसात जलशुद्धीकरण यंत्र दुरुस्त करावे व दहा दिवसातून एकदा शुद्ध पिण्यायोग्य पाणी नळ योजनेद्वारे शहरवासीयांना देण्यात यावे अन्यथा आठ दिवसानंतर नगर परिषदेच्या इमारतीला कुलूप ठोकून नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यावर संविधानाचे अनुच्छेद २१ म्हणजेच मानव मौलिक अधिकाराचे उल्लंघन व सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराच शिवसेना डॉ. गोपाल बच्छिरे व नगरसेवक गजानन जाधव यांनी लोणार न.प.मुख्य अधिकाऱ्यांना दिला आहे.