बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड हिंसाचार घटनेमधील आरोपींना कडक शासन व्हावे तसेच पीडितांना संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आज 26 जुलै रोजी बुलढाणा जिल्हा जमिअत उल्मा ए हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्याजवळील गजापूरमध्ये संतप्त जमावाने मुस्लिम वस्तीवर भ्याड हल्ला केला. मस्जिद,दरगाह, घर,दुकान आणि वाहनांची तोडफोड केली. भरपावसात झालेल्या या हल्ल्यामुळे मुस्लिम महिला व लहान मुलांना आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळावे लागले. हल्लेखोरांनी घर व दुकानातील साहित्यांची पूर्णपणे तोडफोड केली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गजापूर येथील मुस्लिम समाज भीतीच्या वातावरणात जगत आहे. पिडीतांना शासनाने शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच जातीयवादी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जमिअत उल्मा-ए-हिंदचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष हाफिज शेख खलीलउल्लाह यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली.यावेळी मौलाना अब्बास खान, मुफ्ती अनिसोददिन,हाजी सैययद अहेमद,मौलाना फरीद अशरफी,हाफ़िज़ महेबुब मूजावर,हाफ़िज़ आजम,हाफ़िज़ मोहम्मद सूलतान,मौलाना अनिस अशरफी,हाफ़िज़ अकिल मिर्जा,मौलाना मजीद खान, मौलाना जिया उललाह खान,मोहम्मद अमजद, मो.दानिश, काजी आमिर मलिक, अबदूल हारीस यांच्यासह जिल्हाभरातून आलेले पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.