बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यात आज एक अनोखा पण संतापजनक प्रकार घडला! शहरात स्वच्छतेसाठी नियुक्त असलेली “घंटागाडी” आज पुन्हा आलीच नाही. मात्र या निष्क्रियतेला कंटाळून माजी नगरसेवक आकाश दळवी यांनी स्वतःच पुढाकार घेत शहरभर सायकलवर “घंटागाडी” चालवत जागोजागी पडलेला कचरा गोळा केला आणि अखेर तो नगरपालिकेच्या गेटसमोर फेकत प्रशासनाचा निषेध केला!
दोन दिवसांपूर्वीच शिवसेना (शिंदे गट) सोडलेले आकाश दळवी यांनी आज आक्रमक भूमिका घेत बुलढाणा शहरातील नागरिकांच्या समस्या अधोरेखित केल्या. गेल्या 10 ते 20 दिवसांपासून शहरात घंटागाडी येत नाही, स्वच्छतेसाठी कर्मचारीही येत नाहीत, यामुळे संपूर्ण शहरात अस्वच्छता पसरली असल्याचा दळवी यांचा आरोप आहे.दळवी यांनी सायकलवर घंटागाडीचा प्रतिकात्मक उपक्रम हाती घेत प्रत्येक चौक, गल्ली, आणि घरांपुढून कचरा स्वतः गोळा केला. हा जमा केलेला कचरा त्यांनी थेट नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून अधिकाऱ्यांना झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. “नगरपरिषद प्रशासन झोपले आहे, कित्येक दिवसापासून नागरिक मात्र दुर्गंधी आणि समस्यांच्या विळख्यात आहेत,” असा रोष व्यक्त करत त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्ला चढवला.
बुलढाण्यातील नागरिकांना दररोज विजेचा तुटवडा, रस्ते,पाणीपुरवठ्याची बोंब, लिकेजमुळे पाण्याचा अपव्यय आणि आता कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व परिस्थितीमुळे त्रस्त नागरिकांच्या वतीने हा अनोखा आंदोलनात्मक उपक्रम उचलल्याचे दळवी यांनी सांगितले.