बुलढाणा (हॅलो बुलडाणा) केस गळती प्रकरणाची राज्यात चर्चा झाली मात्र खरे कारण कळले नसून,आता ‘टक्कल’ पडल्यावर पायांच्या बोटांची नखं गळत असल्याने शेगाव तालुक्यातील चार गावात भीतीयुक्त वातावरण पसरले आहे.एकूण 37 रुग्ण आढळले असून,यावर आता उपायोजना आवश्यक आहे. मात्र या गंभीर बाबीकडे केंद्रीय आयुष मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी लक्ष वेधावे, अशी मागणी जोर धरत आहे.
केस गळती प्रकरण राज्यात गाजले. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाल्याच्या तक्रारी पुढे आल्यात. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. या नखं गळती प्रकरणाने परिसरात भीतीयुक्त वातावरण दिसून येत आहे. डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागलीत तर अनेकांची नखे गळून पडली.
बोंडगाव येथे 7,कालवड येथे 13, काठोरा 10 आणि मच्छिंद्र खेड 7 असे 37 नखं गळतीने बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. परंतू हा अनामिक आजार कशामुळे होत आहे? हा प्रश्न अनुत्तरीत असून,शासन व प्रशासनाने हा प्रश्न तात्काळ सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे.