जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) तहसीलदार पाटील यांच्या दुर्लक्षामुळे गौण खनिज माफीयांचे मनोबल दिवसागणिक वाढत आहे. जळगाव जामोद तालुक्यातील राजूरा धरणा लगतच्या भिंती जवळून मुरुमाचे दररोज 5 ते 7 टिप्पर भरले जातात. या अवैध उत्खननामुळे तब्बल 15 ते 16 गाव खेड्यांना ही संभाव्य धोक्याची घंटा ठरत आहे. मागील काळात महापूर याच धरणामुळे आला होता हे विशेष!
जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण येथे एक जेसीबी 5 ते 7 टिप्पर अवैध मुरूम उत्खनन करीत आहे. शासनाच्या महसुलाला करोडोंचा चूना लागत आहे. तरीही महसूल विभागाचे कर्मचारी कुंभ झोपेत आहेत की, त्यांनी झोपेचे सोंग घेतले हे जनतेला माहित आहे. महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून माफियाचा सदर प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.राजुरा धरणावर एका डॉन ने गुंडगिरी चालविली असून, गौण खनिज उपसण्याचे तो इतर माफिया कडून बक्कळ पैसे घेतो. शिवाय धरणातील मच्छी देखील ब्लॅक ने विकतो,असाही आरोप होतोय. राजुरा धरणा लगतच्या भिंतीजवळून जेसीबी द्वारे दररोज 5 ते 7 टिप्पर अवैध मुरूम उत्खनन केल्या जात आहे.हा मुरूम रसलपुर गावामध्ये टाकण्यात येतो.येथून पद्धतशीर विल्हेवाट लावल्या जाते.गौण खनिज माफिया हजारो ब्रास गौण खनिज उत्खनन करीत असून, जळगाव जामोद चे तहसीलदार मुग गिळून गप्प बसले आहेत.मागील काळात राजूरा जळगाव जामोद तालुक्यात महापुराने थैमान घातले होते. अनेकांचा संसार उघड्यावर पडून प्रचंड नुकसान झाले होते.हा महापूर राजुरा धरणाच्या पाण्यामुळे आला होता.आता जर धरणाच्या भिंतीजवळ खोदकाम होत असेल तर ही भिंत पुढील काळात कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे 15 ते 16 खेडेगावांना संभाव्य धोका उद्भवू शकतो.