भडगाव मायंबा (हॅलो बुलडाणा) शिक्षणाच्या क्षेत्रात भडगाव मायंबा ग्रामपंचायतीने एक क्रांतिकारी निर्णय घेत शिक्षणाचा दर्जा आणि सरकारी शाळांचे महत्त्व वाढवण्याचा विडा उचलला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी करात सवलत देण्याचा ऐतिहासिक ठराव २४ मे २०२५ रोजी ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
सरपंच अनुसया खडके आणि ग्रामसेविका एस.आर. जाधव यांनी या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, “खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची भरती अधिक आहे, मात्र जिल्हा परिषद शाळेत संख्या कमी आहे. त्यामुळे पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी करसवलतीचा मार्ग निवडला.”या निर्णयामुळे सरकारी शाळांबाबतचा दृष्टिकोन सकारात्मक होईल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना दिलासा मिळेल आणि गावातील मुलांना मातृभाषेत गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळेल, असे ग्रामस्थ राहुल साखरे यांनी सांगितले.
शिक्षक हनुमान पालकर म्हणाले, “ही फक्त एक सवलत नाही, तर सरकारी शाळांना टिकवण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत सरकारी शाळांचा टिकाव लागणे आवश्यक आहे.”भडगाव मायंबा ग्रामपंचायतीचा हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरतोय. ग्रामीण भागात शिक्षणाची गती वाढवायची असेल, तर अशा निर्णयांची नितांत गरज आहे. सरकारी शाळांना पुन्हा ‘संजीवनी’ देणारा हा ठराव खरंच कौतुकास्पद!