चिखली (हॅलो बुलडाणा/सय्यद साहिल) – चिखली नगर परिषदेने आठवडी बाजार, भाजी बाजारसह विविध व्यापारी क्षेत्रांतील भाडे दरामध्ये अचानक 150 रुपये ते 600 रुपये, म्हणजेच चारपट वाढ केली आहे. या निर्णयाने लघु व्यावसायिकांत तीव्र संताप पसरला असून, त्यांनी 30 मे रोजी मुख्याधिकार्यांना आक्रमक निवेदन सादर करून वाढ रद्द करण्याची कडक मागणी केली आहे.गेल्या अनेक दशकांपासून प्रामाणिकपणे भरले जाणारे भाडे अचानक वाढवल्यामुळे कोरोना संकटातून सावरणाऱ्या लघु उद्योगांवर गंभीर परिणाम होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. “चार दशकांपासून कष्टाने व्यवसाय करत आहोत, परंतु ही भाडेवाढ अन्यायकारक आणि जबरदस्त आहे. वाढ रद्द न केल्यास आम्ही तीव्र आंदोलनासाठी सज्ज आहोत,” असे ते म्हणाले.
भाडेवाढीमुळे व्यापारी वर्गाचा आर्थिक ताण वाढत असून, अनेकांनी व्यवसाय बंद करण्याची भीती व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमुळे नुकसान सहन करीत असलेल्या छोट्या उद्योगांना आता भाडे वाढीचा मोठा धक्का बसला आहे.नगरपरिषद प्रशासनावर या प्रकरणी मोठा दबाव निर्माण झाला आहे आणि नागरिकांतही संतापाचे वातावरण आहे. व्यापारी रस्त्यावर उतरून नगरपरिषदच्या धोरणांविरोधात लढा देण्याची तयारी करत आहेत. पुढील काही दिवसांत प्रशासनाचे निर्णय आणि व्यापाऱ्यांचे आंदोलन या प्रकरणाचा नवा वळण ठरणार आहे.