जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) असलगाव येथील आठवड्याच्या बाजारात दर मंगळवारी हजारो नागरिकांची गर्दी होते. संग्रामपूर, नांदुरा, खामगाव, मुक्ताईनगर या तालुक्यांतील नागरिक व व्यापारी येथे येतात. मात्र, बाजार रोडवरील पुलासमोरील रस्ता गेल्या पाच महिन्यांपासून खोदलेलाच असून, काम पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांत प्रचंड रोष व संताप पसरला आहे.खोदलेल्या रस्त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कसरत करत बाजारात यावे लागते. सध्या मान्सूनपूर्व पावसामुळे मातीचे चिखलात रूपांतर झाले असून, प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. व्यापाऱ्यांचे व्यवहार, शेतकऱ्यांचे माल वाहतुकीचे हाल होत आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
ठेकेदार एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने कामाची अजब ढवळाढवळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. पाच महिने लोटले तरी ना रस्ता तयार, ना प्रशासनाला जाग! ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन यांचे ठोस दुर्लक्ष लक्षात येत असून, कोणीही जबाबदारी घेताना दिसत नाही.
गावकऱ्यांचा दैनंदिन व्यवहार, बाजारपेठेचे कामकाज ठप्प झाले आहे. रस्त्यावरील अर्धवट काम आणि पुलाचा खोळंबा हे ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. “आम्ही कर भरतो, पण सोयींऐवजी त्रासच मिळतो,” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रखडलेले काम त्वरित पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.