चिखली (हॅलो बुलडाणा) कायद्याला अनेक पळवाटा आहेत. यामुळे बडे अधिकारी म्हणा की कर्मचारी गलेलठ्ठ पगार असूनही, कर्तव्यात अक्षम्य चूक करून फुकटचा पैसा गोरगरीब दिव्यांगांकडून लुबाडत असल्याचे चित्र आहे.
खरे दिव्यांगाना डावलून स्वतः खोटे व बनावट दिव्यांग प्रमाणपत्र च्याआधारे,आर्थिक व राजकीय पाठबळाचा वापर करून केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी व गट शिक्षण अधिकारी पदावर विराजमान होणे तसेच सन २०२४ मध्ये पवित्र पोर्टल मार्फत शासनाकडून नविन नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकांना विहित मुदतीत नियुक्त न करता लाखों रूपये घेऊन शिक्षक सेवकांना नियमबाह्य रूजू करून घेतल्या प्रकरणी रमेश रतन डुकरे पाटील, गटशिक्षण अधिकारी पं.सं. चिखली यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी त्यांची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधीत शिक्षक सेवकांच्या नियुक्त्या रद्द करून गट शिक्षण अधिकारी रमेश रतन डुकरे पाटील यांना तात्काळ कायमस्वरूपी बडतर्फ करणे बाबत भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा व मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. यांना निवेदनद्वारे मागणी केली होती. दरम्यान दि 30 एप्रिल 2025 रोजी आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली होती. परंतु शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री खरात यांनी संबंधित गट शिक्षण अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने 20 मे 2025 पासून अमरण उपोषण सुरु करण्यात आले. आज उपोषणाचा दुसरा दिवस परंतु उपोषणाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.
गट शिक्षण अधिकारी चिखली यांच्या विरुद्ध तक्रारी असल्यामुळे शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी सर्वात प्रथम त्यांच्याकडे असलेला प्रभार काढायला पाहिजे होता. नंतर खातेनिहाय चॊकशी करून एक ते चार जोडपत्र बजावणे आवश्यक होते. परंतु फक्त नोटीस देण्यात आली. त्या नोटीस ला त्यांनी उत्तर दिले नाही. याचा अर्थ त्यांना पूर्णतः वाचविण्याचे काम ते करीत आहे? तसेच गट शिक्षण अधिकारी यांच्या पाठीशी फार मोठा राजकीय पाठिंबा असल्यामुळे त्याचा सीडीआर तपासण्यात यावा, जेणेकरून त्यांना कोणते राजकीय नेते वाचवीत आहे? हे पण लक्षात येईल अशी मागणी उपोषण कर्ते प्रशांत डोंगरदिवे यांनी केली आहे. यावेळी सम्राट सामाजिक संघटनेचे अध्यक्ष आशिष बाबा खरात, वंचित चे मा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र जैन,मा.जि. प. सदस्य सुमित सरदार, वंचित बहुजन आघाडी चे शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे, राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच चे अध्यक्ष अंबादास घेवंदे, वंचित शहर महासचिव, विजय राऊत, दिलीप राजभोज, राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य विचार मंच चे अध्यक्ष अंबादास घेवंदे, शेतकरी नेते नितीन राजपूत, यांनी उपोषणाला जाहीर पाठींबा दर्शविला आहे.