बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केसगळती व टक्कल या अनामिक व अजूनही पूर्णपणे निर्मूलन न झालेल्या आजाराची दहशत कायम आहे.चार महिन्यांनंतरही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अहवाल लालफीतशाहीतच अडकला असून गुलदसत्यातच आहे. त्यातच नखगळतीच्या विचित्र आजाराने 75 रुग्ण बाधीत झाले मात्र त्यावर ठोस उपाययोजना वा उपचार करण्यात जिल्ह्याचीच नव्हे तर देशाची आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचे अस्वस्थ चित्र आहे.
शेगाव तालुक्यातील या अनामिक आजारा संदर्भात तत्पूर्वी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. बालाजी आद्रर यांनी रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारामागे दूषित पाणी व पर्यावरणीय घटक कारणीभूत असल्याचा संशय आहे.दरम्यान आधीच्या केस गळती प्रकरणाच्या अहवालाची अजूनही प्रतीक्षा आहे. केसगळती प्रकरणी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) पथकाने प्रभावित गावांमध्ये तपासण्या केल्या होत्या. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत अहवाल जाहीर झालेला नाही.असे असले तरी, सेलेनियमचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार बळवल्याचे सांगण्यात येते. खारपाणपट्ट्यातील काही भागांतील जमिनीत सेलेनियमचे प्रमाण अधिक असून, झिंकच्या प्रमाणात घट झाल्यामुळे केस व नख गळतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हात व पायांची नखे पोकळ होऊन गळून पडतात, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
▪️रुग्णसंखेवर दृष्टीक्षेप
शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे 10,कालवड 19,कठोरा 13,मच्छिंद्रखेड 11,घूली 6, पळसखेड 5 तर इतर गावात किरकोळ रुग्ण मिळून एकूण रुग्ण संख्या 75 वर पोहोचली आहे.
▪️ घाबरू नका!
रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केला जात आहे. घाबरण्याचे काहीही कारण नाही. -डॉ. प्रशांत तांगडे, जिल्हा साथरोग अधिकारी, बुलढाणा