बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार देशभरात ‘वक्फ बचाव अभियान’ राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर 2 मे ला दुपारी 3 वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
मुस्लिम समाजाच्या प्रखर विरोधानंतर देखील वक्फ सुधारणा कायदा लोकसभा आणि राज्यसभेत पारित झालेला आहे.हा कायदा मुस्लिम समाजावर अन्याय करणारा आहे, असा आरोप मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केला आहे.हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी देशभरात मुस्लिम समाजाद्वारे विविध प्रकारचे आंदोलन केले जात आहे.मुस्लिम बांधवांनी मागील 30 एप्रिलला रात्री आपल्या घरातील विद्युत पुरवठा खंडित करून “बत्ती गुल” आंदोलन करून या कायद्याचा विरोध करण्याचे आवाहन मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने केले होते. त्यानुसार देशभरातील मुस्लिम समाजाने आपापल्या घरात,दुकानात अंधार करत वक्फ सुधारणा कायद्याचा विरोध केला होता.या कायद्याच्या वक्फ सुधारणा कायद्या विरोधात मुस्लिम समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील 7 जुलैपर्यंत दर शुक्रवारी मुस्लिम बांधव वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करणार असल्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने सांगण्यात आले आहे. निवेदन देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील धर्मगुरू (मौलाना) जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते.