बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रविकांत तुपकर यांनी केलेले आंदोलने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. गतवर्षीच्या खरीप व रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिक नुकसानीचा मोबदला आणि पिकविमा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. रविकांत तुपकरांमुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रविकांत तुपकरांनी सातत्याने आंदोलने केली होती. चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे केलेले अन्नत्याग आंदोलन व त्यानंतर मुंबई येथील मंत्रालय ताबा आंदोलन व त्यावेळी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा व नुकसान भरपाई देण्याची मागणी मान्य झाली होती. परंतु रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांसह रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा नागपूर अधिवेशनावर धडक दिली होती. त्यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पिकविमा व नुकसान भरपाई देण्याचे त्यांनी मान्य केले होते. त्यानंतर पिकविम्याची काही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली पण अजूनही हजारो शेतकरी पिकविम्यापासून वंचित आहेत त्यामुळे रविकांत तुपकरांनी दि.१२ जून २०२४ रोजी पुन्हा एकदा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेवून पिकविम्याची मागणी लावून धरली व प्रधान सचिव (कृषि) यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यानंतर कृषिमंत्र्यांनी पिकविमा कंपनीला आदेश दिले आहेत त्यामुळे आता लवकरच पिकविमा जमा करण्याचे कंपनीने मान्य केल्याने रविकांत तुपकरांच्या आंदोलन व पाठपुराव्याला यश आले असून लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा होणार आहे.