बुलढाणा (हॅलो बुलढाणा/प्रशांत खंडारे) कोणतीही निवडणूक असो काहीजण सेटलमेंटचा फंडा वापरून माघारीच्या वाटेवर उभे राहतात अन् कोणी तगडा उमेदवार मनधरणीसाठी गाठभेट घेतो कां?आणि ‘लक्ष्मीभेट’ देतो कां? याची प्रतीक्षा करीत असतात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील माघार घेण्याच्या तारखेपर्यंत कोण कोण माघार घेतोय आणि कोण सेटलमेंटचे राजकारण करतोय?याकडे काही जाणकार लक्ष वेधून आहेत.
जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात 199 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यांची छाननी करण्यात आली. त्यानुसार 187 अर्ज पात्र तर 12 नामनिर्देशने अपात्र ठरविण्यात आली आहेत. आता एकूण 187 उमेदवारांचे अर्ज कायम असून प्रमुख पक्षांसह घटक पक्ष व संघटना आणि अपक्षांची भाऊगर्दी दिसतेय.यामध्ये नाहक त्रास द्यायचा म्हणून काही उभे राहिले तर काही राजकीय सूड भावनेतून उभे आहेत.आता महायुती व महाविकास आघाडीतील प्रमुख उमेदवारांनी आपली मते ज्या अपक्ष उमेदवाराला पडू शकतात व त्यामुळे आपल्या विजयासाठी त्याची उमेदवारी अडचणीची ठरू शकते, त्यांची मनधरणी करायला सुरवात केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तोपर्यंत त्यांना अर्ज माघार घेण्यासाठी छुप्या मार्गाने विनंती करणे सुरु आहे. याशिवाय त्यांच्या गाठीभेटीदेखील वाढल्या असून जे उमेदवार आपल्या सांगण्यावरून अर्ज मागे घेवू शकत नाही, त्यांना त्यांच्याच जवळील व्यक्तीकडून सांगितले जात आहे. त्यामुळे आता 4 नोव्हेंबरपर्यंत 187 उमेदवारांपैकी निवडणुकीला प्रत्यक्षात किती उमेदवार सामोरे जातात आणि मोठा गाजावाजा करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेऊन सेटलमेंटचे राजकारण करतात?याकडेही लक्ष लागून आहे.