मलकापूर (हॅलो बुलढाणा/ करण झनके) येथील देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे . न.प. प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे.
सदर अतिक्रमण काढून पुतळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.अन्यथा
न.प. कार्यालया समोर बाभळीच्या काट्यांवर बसून उपोषण करण्यात येईल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
स्थानिक तहसील चौक परिसरामध्ये देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आलेले आहे. मात्र गत् काही वर्षांपासून या पुतळ्याच्या व स्मारकाच्या भिंतीलगत मुक्ताईनगर रोड, आठवडी बाजार रोड व या परिसराच्या समोर काही व्यावसायीकांनी आपली दुकाने थाटून त्याठिकाणी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा चा नारा देणार्या नेताजींचा पुतळा आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडून या पुतळा परिसराचे वैभव झाकल्या जात आहे. याबाबत अनेकदा न.प. प्रशासनाकडे तोंडी माहिती देऊन सदर पुतळा व स्मारक परिसरातील अतिक्रमण हटविण्याबाबत मागणी करण्यात आली. परंतु याकडे कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या न.प. प्रशासनााकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्या जात आहे. तरी तातडीने देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्या जवळ झालेले अतिक्रमण काढण्यात न आल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने न.प. कार्यालया समोरच बाभळीच्या काट्यावर बसून उपोषण करावे लागेल, असा इशारा अजय टप यांनी दिला आहे.