बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यात सोशल वॉर सुरू आहे.बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांसह इतरही मंत्री पुतळ्यांच्या अनावरणासाठी दाखल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी पुन्हा नव्याने आमदार गायकवाड यांच्यावर पुतळ्यांचा विषय केंद्रित करून फेसबुकच्या माध्यमातून निशाणा साधलाय. सपकाळ हे सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे.यावर आमदार गायकवाड काय म्हणतात याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल केलेली फेसबुक पोस्ट जशीच्या तशी देत आहोत..’शहरात मोठ्या संख्येने पुतळे झाले असतील तर निश्चित स्वागतच आहे, मात्र त्यांच्या सुरक्षिततेचे काय ? हा मूलभूत व अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित होत आहे. या पुतळ्यांची कुठल्याच परिस्थितीत विटंबना होऊ नये,ते सुरक्षित व सुस्थितीत राहावे ही अपेक्षा मी व्यक्तिशः वारंवार व्यक्त करीत आहे. यात कुचराई झाल्यास भविष्यात शहराचे सामाजिक सौख्य व शांतता भंग होऊ शकते,याचे किंचितही भान मस्तवाल नगर परिषदेला नाही. मी… मी… करणाऱ्या अहंकारी लोकप्रतिनिधीबद्दल तूर्तास सदर संतापजनक घटनेच्या अनुषंगाने न बोललेले बरे !
काल एका पवित्र व पूजनीय परिसरात व आक्षेपार्य स्थळी दोन श्वान (कुत्रे) खुशाल मुक्त संचार करीत होते. योग्य सुरक्षिततेच्या अभावामुळे झालेल्या प्रकरणी जबाबदार कोण ? हा ऐरणीचा प्रश्न ? व भविष्यात असे घडू नये,या करिता नेमके काय करणार ? हा गंभीर प्रश्न !
योग्य नियोजना अभावी व सुरक्षिततेच्या उपाययोजना नसल्यामुळे घडलेली घटना आहे. मात्र मी बुलढाणेकर या नात्याने शर्मिदा तर आहेच व श्रमाप्रार्थी सुद्धा.
ता.क.- आता,आम्हीच स्ट्रक्चरल ऑडिटसाठी पाठवले होते,असे म्हणू नये म्हणजे मिळवली.’
(या पेक्षा ही अधिक संदर्भीय असहनशील घटना घडलेल्या आहेत, सबंधितांना विनंती की दक्षता घ्यावी व त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात.)