धाड (हॅलो बुलढाणा) गावात अन्नातून झालेल्या विषबाधेने थरकाप उडवणारी घटना घडली असून दोन निरागस चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे, तर आई आणि एक मुलगी अत्यवस्थ अवस्थेत जीवनासाठी झुंज देत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जमदार कुटुंबातील मोहम्मद वसीम जमादार (वय 4) आणि मशीरा मोहम्मद जमादार (वय 7) या निष्पाप बहीण-भावाचा मृत्यू झाला. तर त्यांची आई अफरीन मोहम्मद वसीम (वय 34) आणि मुलगी फातिमा (वय 8) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची धक्कादायक बाब म्हणजे, 4 तारखेपासूनच कुटुंबातील मुलांना मळमळ व त्रास जाणवत होता. प्राथमिक उपचारही करण्यात आले होते, मात्र परिस्थिती अचानक बिघडत गेली आणि 5 तारखेच्या सकाळी दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
अन्नातून नेमकी कोणती विषबाधा झाली? अन्नात काय मिसळले होते? हा निष्काळजीपणा आहे की काहीतरी वेगळं? अशा अनेक प्रश्नांनी गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे करत असून, सत्य लवकरच समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूने धाड गाव हादरले असून, या घटनेने अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.










