जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) “मी जिवंत आहे… तरीही कागदोपत्री मला मृत ठरवण्यात आलं!”ही हाक आहे जळगाव जामोद येथील वृद्ध कौशल्याबाई राजपूत यांची. नगर परिषदेच्या भोंगळ, निष्काळजी आणि संशयास्पद कारभारामुळे एका जिवंत महिलेचा मृत्यू दाखला तयार झाला आणि त्या आधारे तिच्या आयुष्याची कमाई लुटली गेली!
धक्कादायक बाब म्हणजे, कौशल्याबाईंच्या मुलाने प्रेमसिंह राजपूत याने ५ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वतःच्या मृत्यूची स्वयंघोषणा केल्याचा अर्ज २३ नोव्हेंबर २०२३ रोजी नगर परिषदेत दिला. त्यानंतर कोणतीही शहानिशा न करता, कोणताही तपास न करता, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कौशल्याबाईंच्या मृत्यूची नोंद केली आणि थेट मृत्यू प्रमाणपत्र दिले
या बनावट मृत्यू दाखल्याच्या जोरावर आईच्या खात्यातील तब्बल १० लाख रुपयांची एफडी मोडण्यात आली. पैसे काढून घेतल्यानंतर वृद्ध आईला अक्षरशः रस्त्यावर सोडून मुलगा फरार झाला, असा गंभीर आरोप आहे.
आई जिवंत असताना तिचा मृत्यू दाखला देणारी ही यंत्रणा नेमकी कुणासाठी काम करते, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
ही माहिती मिळताच कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. “मी जिवंत आहे” हे सिद्ध करण्यासाठी त्या पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत. दोन महिन्यांपूर्वी तक्रार देऊनही अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. ठाणेदारांनी तक्रारही घेतली नाही, असा थेट आरोप कौशल्याबाईंनी केला आहे.आज या वृद्ध महिलेपाशी जगण्यासाठी काहीच उरलेले नाही. ना पैसे, ना कुटुंबाचा आधार, ना प्रशासनाची साथ नगर परिषदेच्या या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी?आणि जिवंत असतानाही मृत ठरवलेल्या कौशल्याबाईला न्याय मिळणार तरी कधी?










