मलकापूर (हॅलो बुलडाणा) नगराध्यक्षपदासाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली खर्चमर्यादा अवघी ११ लाख रुपये असताना, काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतिकुर रहेमान जवारीवाले यांनी तब्बल ५ ते ७ कोटी रुपये खर्च केल्याची जाहीर कबुली देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला आहे. हा व्हिडीओ कोणत्याही हिंदी चित्रपटातील डायलॉग नसून, प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यानचा असल्याचा दावा केला जात आहे. (याची आम्ही पुष्टी करत नाही.)
व्हायरल व्हिडीओमध्ये उमेदवार उपस्थित लोकांसमोर थेट म्हणताना दिसतात की, “५–७ कोटी खर्च झाला, काही मोठी गोष्ट नाही… दोन वर्षांत वसूल होईल”आणि त्याचबरोबर मतदारांना उद्देशून “वोट दिला नाही तर येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाहीत” अशी धमकीवजा भाषा वापरल्याचेही स्पष्ट दिसते. हा प्रकार लोकशाहीच्या मूल्यांवर थेट घाला घालणारा असून, निवडणूक आचारसंहितेची सरळसरळ पायमल्ली आहे.
२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मलकापूर नगर परिषदेच्या थेट जनतेतून झालेल्या निवडणुकीत पैसे, आमिषे, दबावतंत्र वापरल्याचे आरोप आधीपासूनच चर्चेत होते. मात्र आता उमेदवाराच्या तोंडूनच कोट्यवधी खर्चाची कबुली समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. हा व्हिडीओ कथितपणे एका फार्महाऊसवर शूट झाल्याचे दिसते आणि त्याठिकाणी ८–१० जण उपस्थित आहेत.
सवाल एकच आहे. इतका गंभीर प्रकार समोर येऊनही निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?तक्रार होईपर्यंत वाट पाहायची की स्वतःहून दखल घ्यायची? नियम फक्त कागदावरच आहेत का? की तक्रार नाही तर कारवाई नाही हाच अलिखित नियम निवडणूक प्रक्रियेत चालतोय?लोकशाहीचा बाजार मांडणाऱ्या अशा उमेदवारांवर तात्काळ कारवाई होणार का, की हे प्रकरणही वेळेच्या ओघात थंड पडणार याकडे आता संपूर्ण मलकापूरसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










