बुलढाणा (हॅलो बुलढाणा) संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक उत्सवाचा जल्लोष काही क्षणांत दगडफेकीच्या हिंसाचारात बदलला! दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि दगडफेक सुरू झाली. या अचानक झालेल्या प्रकारात पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच संग्रामपूर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्तिथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी दक्षतेने हालचाली केल्या असून सध्या गावात पूर्ण शांतता प्रस्थापित झाली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या घटनेनंतर बावनबीर परिसरात तणावाचे वातावरण कायम असले तरी पोलिसांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात घेतली आहे.
‘हॅलो बुलढाणा’ सतत या प्रकरणावर लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींसाठी आमच्यासोबत राहा!