नांदुरा (हॅलो बुलडाणा/ निलेश पाटील) तालुक्यातील येरळी नवीन पुलावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. आज दि. 28 सप्टेंबर रोजी जळगाव जामोदकडून नांदुराकडे भरधाव वेगात येणारी होंडा सिटी कार (क्र. MH01BU8793) विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (क्र. MH28S9093) जोरदार धडक देऊन चिरडले. या भीषण अपघातात तिवडी येथील वडील राजू घाईट व मुलगा मंगेश घाईट गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना खामगावच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र रस्त्यातच राजू घाईट यांचा मृत्यू झाला. मुलगा मंगेश घाईटची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी अकोल्यात पाठविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरवर धडकून विरुद्ध दिशेला येऊन दुचाकीला चिरडले. याच ठिकाणी केवळ तीन दिवसांपूर्वी बोलेरो पिकपने धडक देऊन जावेद खान चांद खान (रा. नांदुरा) याचा मृत्यू झाला होता.










