बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राज्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट व सीपी ॲण्ड बेरार प्रोव्हींसमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे अनुसूचितजमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे, यासाठी आज बंजारा आरक्षण कृती समितीने लक्षवेधी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चात ‘एक गोर, सव्वा लाखेर जोर’ चा नारा गुंजला!
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यात बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल बंजारा समाजाच्या वतीने हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी मोर्चा काढण्यात आला.तत्पूर्वी जिजामाता प्रेक्षकारासमोर मान्यवरांनी समाज बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्चा काढण्यात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.आदिम लक्षणे असलेल्या मात्र राज्य शासनाने या समाजाला केंद्र सरकारच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यासाठी न केलेल्या शिफारसी त्वरेने लागू करून, अनेक वर्षांपासून सामाजिक अन्याय सहन करत असलेल्या समाजाला न्याय देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी हजारो बंजारा समाज बांधव व भगिनींच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला.बंजारा समाजाला आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्याच्या धर्तीवर हैदराबाद राजपत्राच्या आधारे तातडीने अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण देण्याची शिफारस राज्य शासनाने केंद्राकडे करावी, यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या शासन प्रमुखांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात या समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण धोरण लगू आहे.भाषावार प्रांतरचनेनंतर आंध्र प्रदेशातून राज्यात समावेश झालेल्या नांदेड, परभणी, छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबाद,बीड, जालना, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील बंजारा जमातीला पूर्वी आंध्रप्रदेशात अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळत होते.तसेच सीपी ॲण्ड बेरार प्रोविन्स मध्ये येणाऱ्या बंजारा जमातीला आदिवासीचे आरक्षण मिळत होते.आजपर्यंत नेमण्यात आलेल्या विविध आयोगांनी बंजारा समाजात संवैधानिक आरक्षणास पात्र आहे अशी शिफारस केली आहे.त्यामुळे बंजारा समाज आरक्षणास पात्र ठरतो.मात्र आरक्षण न मिळाल्याने समाज वंचित असून, मोठा अन्याय झाल्याने समाजात असंतोष पसरला आहे.त्यामुळे आरक्षण लागू करण्यात यावे, अन्यथा यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात दिला आहे. दरम्यान आंदोलनावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.