बुलडाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगरपरिषदेची प्रभाग रचना करणे अपेक्षित असतानाही बुलडाणा नगर परिषदेने तयार केलेली प्रभाग रचना ही निव्वळ कागदोपत्री व नागरिकांच्या हिताला बाधक असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या राज्य प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी नगर परिषदेकडे लेखी आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने सुस्पष्ट, न्याय्य व सुयोग्य प्रभाग रचना जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
शासनाच्या आदेशानुसार प्रभाग रचना उत्तर दिशेकडून सुरू करून सलग क्रमाने करणे अपेक्षित होते. मात्र बुलडाणा नगर परिषदेने ही प्रभाग रचना वायव्य दिशेपासून सुरू केली असल्यामुळे भौगोलिक सलगता भंग झाली आहे. नैसर्गिक सीमा – जसे की नदी, महामार्ग, रेल्वे मार्ग, प्रमुख रस्ते – यांचा विचार न करता प्रभाग ठरवण्यात आल्याने अनेक ठिकाणी विभागणी गोंधळात टाकणारी ठरली आहे. प्रभागांची सीमा नागरिकांना समजेल अशा लँडमार्कऐवजी शेत सर्वे नंबरवर आधारित ठेवण्यात आल्याने प्रभाग रचना अधिकच अस्पष्ट झाली आहे. याशिवाय, विदर्भ हाऊसिंग सोसायटीसारखी एकसंध वस्ती मुद्दाम दोन प्रभागांत विभागण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या वस्त्यांचे अन्यायकारक विभाजन करून त्यांचे मतदारसंघ हेतुपुरस्सर विभाजित केले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. लोकसंख्येचे संतुलन न पाळता, नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार न करता नगर परिषदेकडून मनमानी पध्दतीने सदर प्रभाग रचना झाल्याचे दिसून येत असल्याचे ॲड.जयश्री शेळके यांनी सांगितले.“ही प्रभाग रचना स्थळ निरिक्षण न करता बसल्या ठिकाणी कागदोपत्री करण्यात आली आहे.नागरिकांचा, मतदारांचा गोंधळ वाढवून विशिष्ट राजकीय पक्षाला, व्यक्तीला फायदा व्हावा या उद्देशाने हेतूपुरस्सरपणे सदरची प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. सदर प्रभाग रचना रद्द करून शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नव्याने व न्याय्य पद्धतीने प्रभाग रचना करण्यात यावी,” अशी ठाम मागणी ॲड. जयश्री शेळके यांनी केली आहे.