जानेफळ (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड) देऊळगाव साखरशा परिसरात लम्पी हा आजार बळावला असून, पशुवैद्यकीय यांच्या दुर्लक्षामुळे एका पशुपालकाच्या चार गाई व दोन वासरू दगावल्याची घटना समोर आली आहे.विशेष म्हणजे चार दिवसापासून उंबरठा झिजवणाऱ्या पशुपालकांना दवाखाना बंद दिसला तर डॉक्टर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.
देऊळगाव साखरशा शिवारात शेतकऱ्यांसाठी चिंतेत टाकणारी ही घटना आहे. पशुपालक आपले गुरे शेतात राबवत असले तरी, त्यांना जीवापाड जपतात.त्यांना कुठल्याही आजाराची लक्षणे आढळल्यावर पशुवैद्यकीय दवाखाना गाठतात. त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावे यासाठी पशुपालकांना चिंता लागून असते.मात्र पशु वैद्यकीय दवाखाना बंद असला किंवा उघडा असून डॉक्टर गैरहजर असले तर,पाळीव जनावरे उपचारा अभावी पाय खोरत मृत्युमुखी पडतात.सध्या
लम्पी आजाराची लागण होऊन अनेक गुरेढोरे दगावत असल्याची घटना देऊळगाव साखरशा येथे घडत आहे. देऊळगाव साखरशा येथील दिलीप बळीराम राठोड यांचे लम्पी आजारामुळे चार गाई व दोन वासरू दगावले असून पशुवैद्यकीय अधिकारी हे मात्र गैरहजर होते. पशुवैद्यकीय दवाखाना बंद स्थितीत आहे,असा आरोप पशुपालकांनी केला आहे. दिलीप राठोड यांनी पाच वेळेस दवाखान्यांमध्ये जाऊन सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी न मिळाल्याने त्यांची जनावरे दगावली आहे. तरी प्रशासनांनी यांची दखल घेऊन लम्पी आजारापासून जनावरे वाचवावीत, देऊळगाव साखरशा येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांना समज देऊन दवाखाना नियमित सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.