डोणगाव (हॅलो बुलडाणा / अनिल राठोड) नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सहकार विद्या मंदिर जवळील नाल्यावरील पुलाला भीषण तडे व भगदाड पडल्याने आरेगावमार्गे धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस फेऱ्या तातडीने थांबविण्यात आल्या आहेत. परिणामी, शाळकरी विद्यार्थी, कर्मचारी व सर्वसामान्य प्रवाशांची प्रचंड गैरसोय सुरू झाली आहे.
या अचानक निर्णयामुळे दररोज शिक्षणासाठी आरेगाववर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर राहावे लागत आहे. दळणवळणाची साधने बंद झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेवर दखल न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून आरेगाव रस्ता थातूरमातूर पद्धतीने डागडुजी करून दुर्लक्षित ठेवण्यात आला आहे. आज पुलावर गंभीर तडे पडल्याने संपूर्ण मार्गच ठप्प झाला आहे.
गावकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ पुलाचे काम सुरू करून मार्ग मोकळा करावा. अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देत आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण व नागरिकांचे रोजचे व्यवहार यामुळे ठप्प झाले असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.