अंढेरा (हॅलो बुलडाणा) चिखली-जालना महामार्गावरील मेरा खुर्द चौफुलीवर २३ जून रोजी चाळीस वर्षीय पुरुषाचा चाकूने गळा कापून खून केल्याच्या घटनेनंतर, अंढेरा पोलिसांनी तात्काळ हालचाली करत दोघा आरोपींना अटक केली. आज २४ जून रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींना अंढेरा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही २६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
मृतक भारत गजानन वीरशीद (वय ४२, रा. नांद्राकोळी, ता. चिखली) याला आरोपी ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे (रा. वरुडबु, ता. जाफराबाद, जि. जालना) व मनोज केरूबा इच्चे (रा. खोर, ता. चिखली) यांनी पैशांच्या देवाणघेवाणीच्या निमित्ताने मेरा खुर्द फाट्यावर बोलावले. मृतक भारत याच्याकडे आरोपी ज्ञानेश्वरचे १० लाख रुपये होते. पैसे परत मिळत नसल्याच्या कारणावरून संतप्त होऊन आरोपींनी त्याचा जीव घेतला.
भारत वीरशीद हा काळी-पिवळी वाहनाने ठरल्याप्रमाणे फाट्यावर आला असता, आरोपींनी त्याला बाहेर ओढून चाकूने सपासप वार केले. मृतकाने झटापटीत सुटण्याचा प्रयत्न केला, पण चौफुलीवर आंबे व केळ्याचा स्टॉलजवळ आरोपींनी त्याच्या छातीवर बसून तोंडावर चाकूचे वार करत त्याचा गळा कापून ठार मारले.याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना २४ जून रोजी न्यायालयात हजर केले असता २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.